पुणे – शहरात महापालिकेचे अनेक मोठे प्रकल्प प्रस्तावित असून ते मान्यतेच्या टप्प्यात आहेत. तर, अनेक प्रकल्प सुरू असले तरी राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी पुरेशी तरतूद नाही. त्यामुळे शासनाचे पुण्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सोमवारी केली.
त्यात प्रामुख्याने नव्याने समाविष्ट होणाऱ्या 23 गावांसह स्वारगेट-कात्रज मेट्रो, एचसीएमटीआर, पुरंदर विमानतळ यांच्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मिसाळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आपल्या कामगीरीची माहिती दिली.
अधिवेशनात 75 तारांकित प्रश्न व 6 लक्षवेधी सूचना मांडल्या. पर्वती मतदारसंघातील पाचगाव पर्वती वनक्षेत्रासाठी 13 कोटींची मागणी केली होती. अंदाजपत्रकात ही तरतुद झाली. त्यामुळे याठिकाणी वृक्षारोपण, देशी वृक्षांची व बांबूची लागवड, प्रवेशद्वार, उद्यान, जिम, योगा केंद्र, मुलांसाठी खेळशी आदी कामे होणार असल्याचे सांगतानाच अंदाजपत्रकात समाविष्ट 23 गावे, शहरातील उपनगरांना जोडणारा एचसीएमटीआर मार्ग, स्वारगेट-कात्रज मेट्रो, आंबिल ओढा सीमाभिंत यासाठी तरतुद मिळाली नाही.
तसेच झोपडपट्टी पुनर्वसन, पानशेत पुरग्रस्त सोसायटी मालकी हक्क, दिव्यांगाचे प्रमाणपत्र वाटप यावर कोणताही निर्णय अथवा ठोस तरतूद नसल्याने शहराच्या विकासाला अडथळे निर्माण होणार असल्याचे त्या म्हणाल्या.