राहाता -कोवीड-19 च्या संकटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारचा कारभार फक्त फेसबुकवर सुरू आहे. मंत्रीच मुंबईत जावून बसल्याने शेतकरी आणि सामान्य माणसांच्या समस्या वाढण्यास सरकारच जबाबदार असल्याचा थेट आरोप करुन, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला मदत जाहीर करा, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात भाजपच्या वतीने राहाता तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्षा ममता पिपाडा, सभापती नंदाताई तांबे, सभापती रायभान आहेर, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, डॉ. राजेंद्र पिपाडा, उपसभापती ओमेश जपे, नितीन कोते, भाजपचे शिर्डी शहर उपाध्यक्ष रवींद्र कोते, नंदकुमार जेजूरकर आदींनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तहसीलदारांना निवेदन सादर केले.
आ. विखे पाटील म्हणाले, कोविड-19 या महाभंयकर संकटात जनतेला कोणताही दिलासा राज्य सरकार देवू शकलेले नाही. राज्याच्या नेतृत्वाचे सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात दिलेला निधी राज्य सरकार खर्च करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर न पडता फक्त फेसबुकवरच संवाद साधत असून, सरकारचा कारभारही फेसबुकवरच सुरू असल्याची टीका करुन ठराविक मर्जितील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामध्ये सरकार आघाडीवर आहे. विविध विभागांचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईतच बसून राहिल्याने शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत, असे ते म्हणाले.
राज्यातून परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने जात असताना राज्याच्या हद्दीपर्यंत कोणतीही मदत केंद्रे सरकार उभारू शकले नाही. शेतकऱ्यांचे हाल तर मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यांना कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला. ही परिस्थिती सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देत आहे, असेही ते म्हणाले.
==================