कोल्हापूर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डब्बल पीपीई किट घालून बाहेर पडले पाहिजे. ज्यावेळी राजा फिरतो त्यावेळी प्रजा ठिकाणावर असते. मात्र या सरकारकडून असे काहीच होताना दिसत नाही. हे सरकार केरोनाची स्थिती हाताळायला अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत भाजपने येत्या 22 तारखेला “महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली आहे. 22 मे रोजी सकाळी 11 वाजता जनतेने हे आंदोलन करून आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास मोफत केला पाहिजे, असे केंद्रातील विरोधक सांगतात. मात्र, स्थलांतरित मजुरांनी आहे त्याच ठिकाणी राहावे, असे केंद्राचे म्हणणे होते. परंतु, राज्य सरकार स्थलांतरित मजुरांना मदत करण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासाठी राज्य सरकारने निवारा केंद्रे उभारली नाहीत. केंद्राने मदत व पुनर्वसनासाठी राज्याला 1600 कोटी रुपये दिले होते. या पैशांचा वापर मजुरांसाठी केला जाणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तसे केले नाही. त्यामुळे मजूर गावाकडे परतत आहेत.
केंद्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनच्या तिकिटाचा एक तृतीयांश खर्च करत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार मजुरांना एसटीने सोडत असले तरी त्यासाठी दुप्पट पैसे आकारत आहे. मुळात स्थलांतरित मजूर राज्य सोडून जाणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने काय केले, हे सांगावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात करोना येऊन 60 दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे आम्ही 22 तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.