मुंबई – राज्यावर ओढावलेले करोना संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत आहे. त्यातच राज्यात दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
राणे म्हणाले, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढत असताना, हा महाराष्ट्र त्यावर उपाययोजना करायला कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत.
राज्यात डॉक्टर्स नाही, बेड्स नाही, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे. रूग्णांवर उपचार योग्यप्रकारे करणे, त्यांना बरे करणे ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात काय जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाउन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, मग करोना होईल कसा? माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळ्या व्यक्ती रूग्णालयात कसे? म्हणजे जो व्यक्ती आपले कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्णांना कसे सांभाळणार? हे अपयश आहे. हे सरकार करोना हाताळायला कमी पडले आहे.
तसेच, सचिन वाझेला मुंबईतून शंभर कोटी जमा करायला सांगितले, हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. यामध्ये सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग तुम्ही जमा केलेले पैसे, लसीसाठी का नाही वापरत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. मग बेड नाही व्हेंटिलेटर्स नाही असे सांगितले जाते. वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर्स यांची भरती कोणी करायची? असा सवाल देखील राणेंनी यावेळी उपस्थित केला.