पुणे – कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सीईटी सेलच्या प्रवेशप्रक्रियेच्या नियोजनशून्य कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तीन व पाचवर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या वगळता अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढच्या महिन्यात होत आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार अन् परीक्षा कधी होतील, याविषयी विधी शाखेचे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू होत आहे. जवळपास 50 दिवसांत बहुतांश अभ्यासक्रमाच्या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या परीक्षा ऑनलाइन आणि 50 गुणांची घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर होणार आहे. परंतु, या सर्व परीक्षेपासून विधी शाखेचे विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विधी शाखेचे प्रवेश सुरूच
तीन व पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम प्रवेशाची प्रक्रिया मुंबईतील राज्य सीईटी सेलकडून राबविली जाते. सीईटी सेलने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया दि. 10 डिसेंबरपासून सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविली होती. आता प्रवेशाची शेवटची फेरी सुरू आहे. अजूनही प्रवेश सुरूच असून, तीन व पाच वर्षीय विधी शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 3 एप्रिल, 31 मार्चपर्यंत आहे. म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पहिल्या सेमिस्टरसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे.
आठ महिन्यांनंतर अद्याप परीक्षा नाही
तीन व पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शिक्षण जुलै 2020 पासून सुरू झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. वर्षातील दोन सेमिस्टरमध्ये साधारत: चार महिन्यांचे अंतर असते. मात्र, आठ महिने झाले तरीही त्यांच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकही विधी शाखेच्या शिक्षणास वैतागले आहेत.
राज्य सीईटी सेलद्वारे 2016 पासून विधी शाखेची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून कधीच वेळेत प्रवेशप्रक्रिया झाली नाही. सीईटी सेलकडून ढिसाळपणा आणि नियोजन नसल्याचा फटका बसत आहे. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची आठ महिन्यांनंतरही परीक्षा नाही. पुढच्या सेमिस्टरचे अध्यापन सुरू आहे. त्यामुळे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरची परीक्षा देण्यासाठी मागील अभ्यासक्रमाचा अभ्यास करायचा, असा प्रश्न पडला आहे.
– बोधी रामटेके, विधी शाखेचा विद्यार्थी
प्राध्यापकांची वेतनासाठी परवड
बहुतांश विधी महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. जून-जुलैपासून प्राध्यापक अध्यापन करीत आहेत. मात्र, संस्थेकडून पूर्णपणे प्राध्यापकांना वेतन दिले जात नाही. त्यामुळे प्राध्यापकांची आर्थिक कोंडी होत आहे. याउलट विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क वसूल केले जात आहे. मात्र, विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांना संस्थेकडून वेतन कपात केली जात आहे. त्यामुळे प्राध्यापकांची गैरसोय होत आहे.
किमान 90 दिवसांचा अवधी लागेल
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विधी शाखेच्या प्रथम वर्षातील सर्व प्रवेशप्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापन सुरू होईल. पहिल्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किमान 90 दिवसांचा कालावधी लागतो. वेळेत अध्यापन केल्यानंतर जवळपास त्याची परीक्षा जुलै अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे पहिली सेमिस्टरची परीक्षा कधी होतील, याविषयी आताच सांगणे कठीण असल्याचे एका प्राचार्यांनीं सांगितले.