मुंबई (प्रतिनिधी) – करोना विरोधात राज्य सरकारची लढाई सुरू असताना राज्यात शनिवारी एका दिवसात करोनाबाधित 145 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 635 झाली असून आतापर्यंत 52 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 6 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 1 रुग्ण मुंब्रा ठाणे येथील तर 1 रुग्ण अमरावती येथील आहे. उर्वरित 4 रुग्ण मुंबई येथील आहेत. त्यामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 32 झाली आहे. राज्यात आज एकूण 708 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 14 हजार 503 नमुन्यांपैकी 13 हजार 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह, तर 635 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 42 हजार 713 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 2913 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, असे टोपे यांनी सांगितले. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त 1225 व्यक्तींच्या यादीपैकी 1033 व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी 738 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 7 जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत असून मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी 523 टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात 423 टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये 210 टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात 196 नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2849 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.