कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह, महाराष्ट्र राज्य व सबंध भारत देश समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा, गर्दी टाळा व स्वतःसह कुटुंब आणि देश वाचवा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागलमध्ये डी आर माने महाविद्यालयात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्री मुश्रीफ बोलत होते. कागल, मुरगुड व गडहिंग्लज या शहरांसह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडे ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर मशीन घेऊन देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुक्यात एकूण ९६ जण कोरणा पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ५९ पूर्ण बरे झाले आहेत, ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. कागलमधील एका वृद्धाचा मृत्यू झाला. कागलच्या कोविंड काळजी केंद्रात सध्या ४० बेडची सुविधा असून ती वाढवून लवकरच पाचशे बेडची क्षमता करू. या सर्व बेडना ऑक्सिजन पुरवठा व रंगीत एक्स-रे मशीन या सुविधा पुरविल्या जातील.
या आढावा बैठकीवेळी डॉ. के. बी. घेवडे, डॉ. मुकुंद सादिगले, डॉ. नवनाथ मगदूम, डॉ. संजय रूकडे, डॉ. विनोद आवटे, डॉ. संदीप पाटील या खाजगी डॉक्टरांनीही भेटून आवश्यक त्या सूचना केल्या व कोरोना संसर्गाच्या लढाईत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रेयस जुवेकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, कृषी अधिकारी श्री. माळी, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
आनंद आणि दुःख…
श्री मुश्रीफ म्हणाले, आमचे परममित्र जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व त्यांच्या पत्नीही पॉझिटिव आढळून आल्या. दवाखान्यात जायला एखादा दिवस उशीर झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर पहिले चार ते पाच दिवस मी सतत चिंतेत होतो, माझी झोप उडाली होती. आज दोघेही पती- पत्नी बरे होऊन सुखरूप घरी परतत आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे.
मी त्यांना घरीच दहा दिवस थांबायला सांगितले आह. त्यांना भेटण्यासाठी कोणीही जाऊ नका. दहा दिवसानंतर मीच त्यांना भेटायला जाऊन त्यांच्यासमवेत त्यांच्या विहिरीवरील जेवणाचा आनंद घेणार आहे. दुसऱ्या बाजूला कागलमधील ९१ वर्षाचा वृद्ध रुग्ण दगावला, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांचे सगळे कुटुंबच पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारालासुद्धा कुटुंबीयांना येता आले नाही. यासारखे दुर्दैव आणि दुःख अन्य कोणतं असू शकतं? या घटनेचा माझ्या जिवाला चटका लागला, असेही श्री मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे काळजी घ्या, दक्षता घ्या, लक्षणे दिसताच तातडीने दवाखान्यात जा, असे आवाहन त्यांनी केले.