वाल्हे -पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या नीरा गावापर्यंत नुकतीच पीएमपीएल बस सेवा सुरू केली. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या, पीएमपीएल बससेवेला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे; मात्र जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळच्या सत्रात कामासाठी जाणाऱ्या कामगारांची मात्र गैरसोय कायम आहे.
सकाळच्या पाळीत कामाला जाणारा मोठा कामगारवर्ग, तसेच महिला वर्गाची संख्या मोठी असते. त्यामुळे या मार्गावर कंपनी भरण्याच्या वेळेत म्हणजेच नीरा येथून सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बस सुटल्यास जेजुरी औद्योगिक वसाहतीपर्यंत सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पोहोचली तर सर्वच कामगारांची सोय होईल.
यामुळे पीएमपीएल बस प्रशासनाने या वेळकडे विषेश लक्ष घालून सकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान दोन बस नीरा येथून जेजुरी औद्योगिक वसाहतीकडे सोडण्या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. अनेक प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे यामार्गावरील गावातील नागरिकांना बसध्ये जागाच मिळत नाही. पिंपरे, पिसुर्टी, दौंडज, वाल्हे या गावातील प्रवाशांना या बसमध्ये जागाच मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे.
बसेसची संख्या अपुरी
हडपसर ते नीरा या मार्गावर पीएमपीएलएमने 21 जानेवारीपासून बस सेवा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना या बससेवेचा चांगला उपयोग होतोय; मात्र सध्या येत असलेली बसची संख्या अपुरी पडत असून बसच्या फेऱ्या आणखी वाढवाव्यात, अशी मागणी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, नीरा गावचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांनी केली आहे.
…तर जागा कशी मिळणार?
शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे या मार्गावरील बसमध्ये अजूनतरी विद्यार्थ्यांना प्रवासाचा योग आला नाही; मात्र शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर या मार्गावरुन अनेक विद्यार्थी या पीएमपीएल बसने प्रवास करतील. आताच्याच प्रवाशांना नियमित उभे राहून प्रवास कारावा लागत असून विद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा कशी मिळेल? अशी चिंता पालक वर्गाला लागली आहे. यामुळे या मार्गावर पीएमपीएल बसच्या दररोजच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांमधून होत आहे.