नीरा – परिसरातील वीज खांबावरील खासगी धोकादायक केबल काढण्यात आल्या आहेत. याबाबत “दै. प्रभात’ने शुक्रवारी (दि. 17) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महावितरणकडून नीरा उपकेंद्रातील खांबावरून केबल काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 17) सकाळपासून खांबावरील केबल हटवल्या जात आहेत.
पुरंदर, बारामती तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी केबलमार्फत सेवा दिली जाते.
अनेक गावात केबल यंत्रणा उभी करताना केबलचालकांनी अनेक ठिकाणी महावितरणच्या खांबांचा आधार घेतलेला दिसून येतो. यावर वीज वितरणकडून फारसा आक्षेप घेतला जात नसला तरी संभाव्य धोका पाहता या केबल काढण्याची मागणी पुरंदरमधील काही संघटना, तसेच नागरिकांनी केली होती. त्याची दखल घेत महावितरणतर्फे या केबल काढण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले होत्या.
याबाबत संबंधित केबल व्यावसायिकांना महावितरणने केबल काढण्यासाठी सांगितले होते. मात्र, या केबल काढण्यात न आल्याने शुक्रवारी (दि. 17) दै.”प्रभात’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नीरा उपविभागात येणाऱ्या सर्वच खांबावरील केबल काढण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी तातडीने केबल काढणे शक्य आहे. त्या काढल्या जात आहेत, तसेच ज्या ठिकाणी वीज प्रवाह बंद करावा लागणार आहे, अशा ठिकाणच्या केबल लोडशेडिंगच्या काळात काढल्या जातील, अशी माहिती महावितरणचे सोमनाथ फासगे यांनी दिली.
महावितरणने केलेल्या या कारवाईमुळे ग्रामीण भागातील केबल व्यवसाय कोलमडून पडणार आहे. त्यामुळे घराघरांत पोहोचलेली केबल बंद होणार असून, टीव्हीवर “नो सिग्नल’ असाच संदेश पाहायला मिळणार आहे. दरम्यान केबल चालकांनी पर्यायी उपयोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे लवकरच ही सेवा पूर्ववत सुरू होईल, असा विश्वास नीरा येथील केबल चालक प्रदीप घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.