मुंबई – भारताच्या महिला क्रिकेट क्षेत्रात नवनवीन खेळाडू पुढे येत आहेत, त्यांच्याकडे गुणवत्ताही आहे, त्यामुळे जसे इंडियन प्रीमिअर लीगमुळे (आयपीएल) पुरुषांच्या क्रिकेटमध्ये गुणवान खेळाडू मिळाले तसेच महिला खेळाडू देखील गवसतील. मात्र, त्यासाठी महिलांसाठीही आयपीएल स्पर्धा आयोजित करावी अशी विनंती लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना विनंती केली आहे.
भारताच्या महिला संघाला टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आपल्या देशात अफाट गुणवत्ता आहे, जर पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटलाही गुणवान खेळाडू मिळावेत असे वाटत असेल तर महिलांच्या आयपीएलला प्रारंभ झाला पाहिजे. आयपीएलमध्ये महिलांचे जास्त संघ निर्माण नाही झाले तरी जितके संघ होतील त्यांच्यात स्पर्धा खेळविणे कठीण नाही. अशा स्पर्धेचे आयोजन झाले तरच महिला क्रिकेटचा चेहरा बदलेल. प्रगती साधण्यासाठी केवळ गुणवत्ता असून चालत नाही तर जास्त स्पर्धा खेळायला मिळाल्या पाहिजेत.
ऑस्ट्रेलियात ज्या प्रकारे महिलांची टी-20 बिग बॅश लीग खेळवण्यात येते तशी भारतातही स्पर्धा व्हावी. बिग बॅशमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांना खेळण्याची संधी मिळाली तशी आणखी खेळाडूंना संधी मिळेल पण त्यासाठी आपल्याकडे अशा स्पर्धा होणे आवश्य़क आहे, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे.