प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल-लोढा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे, औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. आर. शिंपले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहायक संचालक चंद्रशेखर ढेकणे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सा. बा. मोहिते, ह. श्री. नलावडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती व उद्देश, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे पैलू तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या एलईडी डिस्प्ले व्हॅनवरुन प्रदर्शित करण्यात येत आहे.