कर्जत – मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वाढीव मिरजगाव पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करण्याचे साकडे मिरजगाव ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ मंगळवारी नगर येथे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घातले.
शहरातील पाणी वितरण व्यवस्था कालबाह्य झाली असल्याने व सध्या शहरात पाच लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभावरून शहरात पाणीपुरवठा होत आहे. परंतु हा जलकुंभही धोकादायक झाला असून हा जलकुंभही जमीनदोस्त करण्यास गुणवत्ता पडताळणी अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असला तरी शहरात समांतर पाणीपुरवठा होत नाही. सीनाधरणाहून पाणीपुरवठा करणारी योजना ही 1995 साली झालेली आहे तर शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ही सिमेंट पाइपची आहे व ही 1972 साली झालेली आहे, सिमेंट पाइप कुठले असून झाडाच्या मुळ्या या पाइपात जात असल्याने कारणाने वारंवार पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडत असल्याने पाणी सातत्याने विस्कळीत होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वाढीव साडेसात कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर असून निविदा 13 नोव्हेंबर 2018 निघाली. या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती झाली, परंतु आठ महिने झाले मात्र या कामांबाबत जीवन प्राधिकरणाकडून कोणत्याही कार्यवाही होत नसल्याने या पार्श्वभूमीवर माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. आदिनाथ चेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रवींद्र खांडेकर यांची भेट घेऊन जलकुंभचे काम तातडीने करून द्या, अशी मागणी केली. खांडेकर यांनी काम सुरू करण्याचा आदेश मिळणे बाकी असून तो लवकरच मिळाले व आपण सुचवलेल्या सूचना विचारात घेऊ असे सांगितले.