नेवासा: ज्या गावाला माणसी वीस लिटरपेक्षा कमी पाणी मिळते, अशा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अधिकाऱ्यांना टंचाई आढावा बैठकीत दिल्या. तसेच तालुक्यात दुष्काळाच्या संदर्भात ज्या काही समस्या व अडचणी आहेत, त्याबाबत आम्ही अहवाल मागूनवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नेवासा फाटा येथे नेवासा तालुका टंचाई आढावा बैठक आ. मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपआपल्या भागातील समस्या यावेळी मांडल्या. त्याची नोंद घेत ते सोडवण्याचे आश्वासन आ. मुरकुटे यांनी दिले. टंचाईच्या काळात अधिकाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी थांबण्याचे आदेश आहेत. जर ग्रामसेवक, तलाठी यांनी या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईची भूमिका आपण घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. टंचाई बाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व कार्यवाही याबाबत अहवाल सादर करण्यात येऊन, तो अहवाल मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यां पाठविला जाईल, असे आ. मुरकुटे यांनी बोलतांना स्पष्ट केले.
यावेळी शेतीपंपासाठी व नळपाणीपुरवठा योजनेतील येणाऱ्या गावांसाठी नियमित वीजपुरवठा करण्यात यावा, पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची मर्यादा बारा तास इतकी ठेवण्यात यावी, संपुर्ण कर्जमाफी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. पिण्याच्या व पाटपाण्याच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. त्यास आ. मुरकुटे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, सहायक गटविकास अधिकारी पाखरे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, शेतकरी नेते अंबादास कोरडे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कुलकर्णी, कृषितज्ज्ञ एकनाथराव भगत, ऍड. विश्वास काळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, राजेंद्र निंबाळकर, बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास साळुंके, जनार्दन जाधव, ऍड. अण्णासाहेब अंबाडे, नगरसेवक सुनील वाघ, सचिन नागपुरे, भारत डोकडे, राजेंद्र मापारी, विवेक नन्नवरे, नेवासा बुद्रुकचे माजी सरपंच बाबा कांगुणे, अशोकराव टेकणे, युवा सेनेचे जिल्हा प्रतिनिधी नीरज नांगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता सुनील नरसाळे यांच्यासह नेवासा तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, विविध खात्यांचे अधिकारी व पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी
नेवासा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. तालुक्याची 50 पेक्षा कमी पैसेवारी आहे. 2018-2019 च्या शैक्षणिक वर्षात माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व्हावे, अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद अभंग यांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांना ठराव तयार करण्याच्या सूचना आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी दिल्या.