सातारा (प्रतिनिधी) – जावळी तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वाड्यावस्त्यांवर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होत असते. अशा ठिकाणच्या लोकांना तातडीने पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त वाड्यावस्त्यांवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने टॅंकर सुरु करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
जावळी तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा व निवारण समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी तहसीलदार शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सौ. अर्चना रांजणे, पंचायत समिती सभापती सौ. जयश्री गिरी, सदस्य सौ. अरुणा शिर्के, विजयकुमार सुतार, ज्ञानदेव रांजणे, उपअभियंता डी. व्ही. पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, नायब तहसीलदार सुनील मुनावळे, तपासे, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यामध्ये 39 गावे व 26 वाड्यांमध्ये पाणी टंचाई घोषित झाली असून त्यावर उपाय योजना करण्यासंदर्भात चर्चा झाली.5 गावांना सेवा भावी संस्थांमार्फत पाणी पुरवठा सुरू असून 5 गावांना शासकीय टॅंकर सुरू करण्याबाबत नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. तेटली, मोरावळे व खामकरवाडी येथील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. टंचाई उपाय योजना अंतर्गत सांगवी तर्फ मेढा, रेंगडी, मुकवली, गांजे पाटणेमाची या नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कामांना जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे.
ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई भासत असेल त्यांनी टॅंकर मागणीचे प्रस्ताव सादर केल्यास सत्वर टॅंकर मंजुरीबाबत कार्यवाही करावी अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. बामणोली दंडवस्ती व कुसूंबी गावचे वरील मुऱ्यावर पाणीटंचाई असलेबाबत सदस्यांनी सांगितले तसेच तालुक्यात ईतर ठिकाणी पाणीटंचाई असल्यास सत्वर उपाययोजना करण्यात यावी अशा सूचना केली. याबाबत गटविकास अधिकारी यांनी टंचाईग्रस्त गावांना मागणीनुसार टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले.
कोणतीही वाडी वस्ती टंचाईग्रस्त राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. विविध गावांचा कायमचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाने आराखडा, प्रस्ताव तयार करावा. पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देऊ. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने टंचाई निवारणाचे काम करावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले.