चिंचवड – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून दररोज एक हजार शासकीय कर्मचारी व अधिकारी रेल्वेने मुंबईला प्रवास करतात. सध्या रेल्वे बंद असल्याने त्यांना जीव धोक्यात घालून दुचाकीवरून प्रवास करावा लागत आहे. मुंबईच्या धर्तीवर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी पुणे-मुंबई दरम्यान एक रेल्वे प्रवासी गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी चिंचवड (पुणे) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दररोज सकाळी सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, नांदेड पनवेल एक्स्प्रेस या रेल्वेने प्रवासी प्रवास करीत असतात. परंतु सध्या सर्व रेल्वे गाड्या आणि सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
आपण पाठपुरावा करून मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या दरम्यान डेक्कन क्वीन ही एक्स्प्रेस सेवा उपलब्ध करून द्यावी. हीच ट्रेन सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान परतीच्या प्रवासाकरिता ठेवावी.
या रेल्वेच्या एका बोगीत 40 जण बसून आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करू, अशी हमी रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलानी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात दिली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे लोणावळा लोकल उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी या निवेदनात केली आहे.