कोल्हापूर- दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी आरोग्यविभागाने कोरोना प्रतिबंधक जनजागृती प्रभावीपणे राबविण्या बरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई व्यापक करावी तसेच पोस्ट कोव्हीड कार्यक्रमही प्राधान्यक्रमाने हाती घ्यावा तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरफाळ्याच्या दंडामध्ये सवलत योजना राबवा, अशी सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी केली.
महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभागृहात आयोजीत केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत महापौर सौ.निलोफर आजरेकर बोलत होत्या, बैठकीत आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्राथमीक शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रभाग समिती सभापती सौ.रिना कांबळे, गटनेते शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
कोरोना कमी झाला असला तरी धोका कायम आहे, याची जाणीव नागरिकांना करुन देण्यासाठी प्रबोधनावर भर देण्याची आवशकता व्यक्त करुन महापौर सौ.निलोफर आजरेकर म्हणाल्या, नागरिकांना कोरोनाचे गार्भिय समजावून देण्याबरोबरच गर्दी होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, नेहमी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दी मध्ये जाणे टाळणे, वारंवार हात धुणे या गोष्टी बंधनकारक कराव्यात, यामध्ये कसल्याही प्रकारे हयगय करु नका असे त्यांनी सुचवले. श्री अंबाबाई मंदीर परिसर तसेच मुख्य बाजार पेठामध्ये गर्दी रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथके कार्यान्वीत केली जातील असे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने चांगली कामगीरी केली असून पोस्ट कोव्हीडचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घ्यावा, यासाठी शाहू स्मारक भवन येथे पोस्ट कोव्हीड सेंटर लवकरच कार्यान्वीत करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेत कार्यरत असतांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे देय असना-या मदतीचे प्रस्ताव तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. तसेच एचआरटीसी रुग्णांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी आवश्यकते प्रयत्न करावेत असे महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी सांगितले. महापालिकेचे कोरोनामुळे नऊ कर्मचारी यांचे मृत्यू झाले असून कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहा जणांचे प्रस्ताव शासनामार्फत विमा कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत. उर्वरीत तीन कर्मचारी यांच्या कडून आवश्यक कागदपत्रे घेऊन ते ही प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात येतील. तसेच कोरोना पॉझिटीव्ह कर्मचारी यांचे वैद्यकीय बिल रियंबर्समेंट द्वारे महापालिका देईल, असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
शहरात कोरोना, डेंग्यू , चिकन गुणीया अशा संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणी, फॉगींग, हॅन्ड पंपाद्वारे फवारणी तसेच अन्य स्वच्छतेचा कार्यक्रम आरोग्य विभागाने गतिमान करावा. या कार्यक्रमाची अंमलबजावणीचे दैनदीन नियोजन करावे अशी सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी केली. डेंग्यू, चिकण गुणीया रोखण्यासाठी औषध फवारणी बरोबरच शहरात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात यावी अशी सुचना महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली.
शहरात ट्रक टर्मिनन्स कडे जाणाऱ्या रस्त्यांची निवीदा प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच हे काम सुरु होईल. तसेच गाडी अड्डा पार्किंगचे काम हाती घेण्यात येत असून त्यामध्ये असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी शहर अभियंता यांनी विशेष मोहिम हाती घाव्यी अशी सुचना आयुक्तांनी केली. सरस्वती टॉकीज येथील मल्टीलेवल कार पार्किंग उभारणी तात्काळ करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या सुधारीत आराखडा करण्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घावी यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रक्रिया संहा.संचालक नगररचना यांनी तातडीने करावी अशा सुचना त्यांनी केली.
शहरातील ईएसएसएल कंपनीमार्फत एलईडी बसविण्याचे कामे संत गतीने सुरु आहेत. सदस्यांच्या वारंवार तक्रारी वाढत आहेत. याबाबत दक्षता घेऊन यापुर्वी लिऑन कंपनीचे बंद पडलेले दिवे काढून त्या जागी ईएसएसएल कंपनीचे दिवे बसवावेत अशी सुचना गटनेते राहुल चव्हाण आणि नगरसेविका माधुरी लाड यांनी केली. यावेळी बोलताना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत म्हणाले, पुर्वीच्या कराराप्रमाणे 16 हजार दिवे होते. परंतू कालांतराने वाढलेल्या दिव्यांची संख्या पाहता ती संख्या 26512 झाली आहे. त्यामुळे उर्वरीत दिवे बदलण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात येत असून पुर्वीच्या कराराप्रमाणे 16 हजार दिवे तात्काळ बसविण्यात येत असलेचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरु ठेवा तसेच शहरात बापट कॅम्प, कदमवाडी, कसबा बावडा किंवा आरक्षित स्मशानभूमीच्या ठिकाणी विदयुत दाहिनी बसविण्याबाबत नियोजन करण्याची सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली. या स्मशानभूमींचे सुशोभिकरण करण्याबरोबरच कंपौड वॉल आणि परिसरात मोठया प्रमाणात झाडे लावण्याची सुचना त्यांनी केली.
शहरातील सार्वजनिक शौचालये तसेच मुताऱ्यांची वेळोवेळी स्वच्छता करावी या स्वच्छता कामाबाबत नियेाजनबध्द कार्यक्रम निश्चित करावा. तसेच शहरात बीओटीमधून बांधलेल्या 11 सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीची प्रशासकिय कार्यवाही पुर्ण करा, अशी सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी केली.
शहरात ब्लड कंपौनंट बँकेची उभारणी प्राधान्याने करण्याची सूचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी केली. याबाबत आवश्यक ती पूर्तता पूर्ण करुन हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या सुचना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केली.
शहरात असलेल्या महापालिकेच्या गाळेधारकांना रेडीरेकनर नुसार भाडे आकरण्याबाबत शासन निर्देश आहेत, त्यामुळे 2015 पासून गाळेधारकाकडून भाडे वसूली झालेली नाही. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. याबाबत इस्टेट विभागाने शासन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करुन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी सुचना गटनेते शारगंधर देशमुख यांनी केली. याबाबत लवकरच जिल्हास्तरावर समितीकडून रेडिरेकनरचे दर निश्चित करुन घेण्याबाबत प्रयत्न केले जातील असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, या पार्श्वभूमीवर उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी विचारणा केली. तसेच कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नती तसेच ठोकमानधावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ याबाबतही आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचनाही महापौरांनी केल्या.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी वसूलीवर भर देण्याबरोबर अन्य उत्पन्न् वाढीचे पर्याय उपलब्ध करण्यासाठी सर्व विभागांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतही सविस्त आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल. महापालिकेमध्ये ईऑफिस प्रणाली राबवून कामकाज करण्याचा मानस आहे. मात्र हे काम होईपर्यंत सर्व प्रशासकीय कामकाज पुर्वीच्याच पध्दतीने मॅन्युअली केले जाईल. कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नती तसेच ठोकमानधावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ याबाबतही आवश्यक कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
त्याचबरोबरच महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी याबैठकीत आयटीपार्क उभारण्याबाबतच्या अडचणी दूर करुन आवश्यक कार्यवाही करावी. झूम प्रकल्पावरील कचरा उठाव करण्याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला केली. झूम प्रल्पाच्याठिकाणी असणारा डांबर प्लॅन्ट इतर ठिकाणी स्थलांतरीत करून सुरु करावा असेही या बैठकीत सुचविण्यात आले. धान्य बाजार पुर्ण क्षमतेने स्थलांतरीत करुन लक्ष्मीपूरीत होणारी गर्दी कमी करावी. शिक्षण मंडळाच्यावतीने सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा यावेळी आढावा घेण्यात आला. ऑनलाईन शिक्षणापासून वंचीत राहिलेल्या विदयार्थ्यांसाठी आवश्यक उपाययोजना करा अशी सुचना केली. यावेळी काळंम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेची उर्वरीत कामे मार्गी लागण्यासाठी स्टेरिंग कमिटीची बैठक घ्यावी, तसेच महापालिकेचे विविध देयके व कर भरण्यासाठी ॲप तयार करा. तसेच गुगल पे, फोन पे सुरु करण्या बाबतची कार्यवाही विनाविलंब करण्याची सुचनाही त्यांनी केली.
वर्कशॉपसह अन्य विभागाकडील स्क्रॅप व रददी विकण्याबाबत लिलाव प्रक्रिया राबवावी अशी सुचना उपमहापौर संजय मोहिते व स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली.
प्रारंभी महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. महापालिकेच्या उत्पन्नवाढीबाबत आवश्यक उपाययोजना, वसूली तसेच अन्य विकास कामांबाबतही यावेळी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका सौ.माधूरी लाड, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, संदिप घारगे, चेतन कोंडे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, आारोग्यधिकारी डॉ.अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगररचना सहा.संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, रावसाहेब चव्हाण, बाबुराव दबडे, हर्षदिप घाडगे, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.