मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई – राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात रोजगार हमी योजनेची कामे त्वरीत सुरू करावीत असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दुष्काळग्रस्तांसाठीच्या कामात आचारसंहितेचा कोणताही अडथळा नाही. अशा कामांना तीन दिवसांत प्रशासकीय मंजुरी द्या अशा सुचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आचारसंहितेचे नाव सांगून कोणतेही काम प्रलंबीत ठेवता येणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिला आहे.
राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी त्यांनी आज ऑडिओ ब्रिज तंत्रज्ञानाने संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हे तंत्रज्ञान आपल्या मोबाईल फोन द्वारे, वापरता येते त्यानुसार त्यांनी आपल्या वर्षा या अधिकृत निवासस्थानापासून हा संवाद साधला. या कामांचा अहवाल सादर करण्याची सुचनाही त्यांनी यावेळी सर्व संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याच्या टॅंकरचे वाटप करण्याच्या सुचना त्यांनी तहसिलदारांना दिल्या. गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजनेची कामेही त्वरीत सुरू करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.