कोपरगाव (प्रतिनिधी) –नाशिक- औरंगाबाद विमान सेवा बंद असल्याने शिर्डी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू केल्यास नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील शेतकरी व व्यापारी आपला शेतमाल निर्यात करू शकतील. हे विमानतळ राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासासही कार्गो सेवेतून हातभार लागणार आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळ येथे टर्मिनल व्यवस्थापक एस. मुरलीकृष्णन, सहायक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे व इतर अधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत केल्या.
कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याबाबत आ. काळे यांनी नुकतीच विमान प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची काकडी विमानतळ येथे बैठक घेतली. यामध्ये कार्गो सेवेसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी व कार्गो विभाग तीव्र गतीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी व कायदेशीर प्रक्रियेत मदत करण्याचे आश्वासन त्यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. विमानतळावरील स्थानिक कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न त्वरित सोडविण्याच्या सूचनाही दिल्या.
विमानतळ ते शिर्डी या मार्गावर दुतर्फा पथदिवे बसवावेत, प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थानिक प्रवासी कमिटी तयार करावी, प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर स्क्रिनिंग मशिन वाढवावे, पावसाळ्यात धावपट्टीवर साचणारे पाणी काकडी ग्रामस्थांना पाईपलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे व विमान प्राधिकरणाने जी आश्वासने प्रकल्पबाधितांना व काकडी ग्रामस्थांना दिली आहेत, त्यांची पूर्तता करावी, तसेच कर्मचाऱ्यांना विमान सेवा सुरू झाल्यास प्रवासी सुरक्षा व लॉकडाउनचे सर्व निर्देश पाळूनच कामकाज करण्याच्या सूचना आ. काळे यांनी दिल्या.