नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने कर्ज फेररचना करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांनी 15 सप्टेंबरपर्यंत सुरू करावी, अशा सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत.
या विषयावर सीतारामन यांनी आज बॅंकर्सशी चर्चा केली. कर्जाचा हप्ता न भरण्याची सवलत संपली आहे. अशा खातेदारांना आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. तीन तास चाललेल्या बैठकीनंतर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जे कर्जदार कर्ज फेररचनेसाठी पात्र आहेत, अशांना ओळखून त्यांना या योजनेबद्दल माहिती द्यावी.
त्याचबरोबर कर्ज फेररचनेची माहिती बऱ्याच खातेदारांना माहित नाही. हि माहिती व्हावी याकरिता माहिती प्रसारणाची मोहीम बॅंकांनी राबवावी. यासाठी हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेचा वापर करावा.
यावर बॅंकर्सनी सांगितले की, योजना जाहीर झाल्यापासून आम्ही लगेच या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. पात्र खातेदारांची ओळख करण्यात येत असून त्यांना याबाबत माहिती दिली जात आहे. योजना मर्यादित काळासाठी लागू केली जाणार असल्यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त ग्राहकांना या योजनेचा लाभ होण्याची गरज आहे असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.