नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाच्या (एनआरसी) मुद्द्यावर एक बोलतात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याविषयी वेगळेच बोलतात. त्यामुळे भाजपमध्ये सध्या स्टार वॉर सुरू असल्याचे दिसते, अशी खिल्ली कॉंग्रेसकडून उडवण्यात आली.
अर्थव्यवस्थेची घसरण, नोटाबंदी, महिला सुरक्षा यांच्याबरोबरच नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून कॉंग्रेस सातत्याने मोदी सरकारला घेरत आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यात आघाडीवर आहेत. त्यावरून भाजपने शुक्रवारी राहुल यांचा उल्लेख वर्षांतील सर्वांत खोटारडी व्यक्ती अशा स्वरूपात केला.
त्यावरून कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. राहुल यांनी विविध समस्यांवरून विचारलेल्या कठीण प्रश्नांची उत्तरे देणे मुश्कील बनले की भाजपकडून व्यक्तिगत हल्ला केला जातो.
विरोधी पक्ष या नात्याने जनतेला वाटणारी चिंता समोर आणण्याची जबाबदारी कॉंग्रेसची आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर आम्ही प्रश्न विचारतच राहू, असे ते म्हणाले.