सातारा – बेसुमार दारु पिण्या मद्यपिंना रात्री घराचा रस्ताही घावत नसल्याने अनेक मद्यपी नगरवाचनालयाच्या पायरीलाचा आपला आधार समजत आहेत. सकाळी नऊ ते दहा वाजले तरी तळीराम या पायऱ्यांवरच पडलेले दिसत असतात. अनेकदा दारुच्या नशेत रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करण्याचे प्रकार या तळीरामांकडून होतात. विशेषत: महिलांवर्गांमध्ये याप्रकरणी संतप्त भावना व्यक्त होत असून पोलीस तसेच पालिका प्रशासनाने समन्वयातून हा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.
अजिंक्यतारा, कास, बामणोली यासह शहराच्या परिसरात असणाऱ्या अनेकठिकाणी पर्यटन ठिकाणी वारंवार मद्यपींच्या पार्ट्या झडत असतात. यावर आजपर्यंततरी कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे सांगता येणार नाही. मात्र, हे सर्व कमी होते म्हणून काय आता दारुच्या नशेत तर्रर्र असणाऱ्या या तळीरामांनी नगरवाचनाल्याच्या पायऱ्यांनाच आपला अड्डा बनविला आहे. दिवसभर दारु पिऊन रात्रभर नगरवाचनालयाच्या पायऱ्यांवर तळीराम पडू लागले आहेत. अनेकदा दारुच्या नशेत तळीराम नागरिकांसह महिलांनाही शिवीगाळ करत असल्याचे प्रकार याठिकाणी घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या मार्गाने महिलांचे ये-जा करणे कितपत सुरक्षित आहे? याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या तळीरामांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.