मुंबई: राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात सुरु असलेला संप मिटत नसल्याने एसटी महामंडळाने आता कारवाईचे अस्त्र बाहेर काढले आहे. संपात रोजंदारीवरील कर्मचारीही असल्याने त्यांना कामावर रूजू होण्यासाठी महामंडळाने थेट सेवा समाप्तीच्या कारवाईचा निर्णय घेतला आहे. कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देतानाच या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत.
सध्या ८५ हजार ३७१ कर्मचारी संपात सामिल असून ६ हजार ८९५ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. महामंडळाने गेल्या तीन ते चार दिवसांत कर्तव्यावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरुच ठेवली आहे.
आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचारी निलंबित झाले आहेत. निलंबन झाले, तरीही या धास्तीने कामावर परतणाऱ्यांची संख्या अद्याप कमीच आहे. त्यामुळे कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यात दोन हजारपेक्षा जास्त रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक व वाहकही आहे.
संपात हे कर्मचारीही सामिल आहे. या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून कर्तव्यावर हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली जाईल. नोटीस बजावल्यानंतर २४ तासांत कर्मचारी कामावर न परतल्यास कारवाई होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई सेवा समाप्तीची असेल, असेही स्पष्ट के ले.
संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळाने आणखी हालचाली तीव्र के ल्या आहेत. कर्मचारी कामावर पुन्हा परतावेत यासाठी एसटीतील काही कामगार संघटनांची मनधरणी के ली जात आहे. यासाठी सोमवारी सायंकाळनंतर परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटीतील काही कामगार संघटनांची बैठकही पार पडली. यात एसटी पुर्ववत करण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खासगी बस,शालेय बस,वडाप यांना प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. तसेच काही प्रमाणात एसटीही सुरु के ल्या जात आहेत. परंतु संप सुरुच राहिल्यास बेस्ट उपक्र मा प्रमाणे भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा व त्यासह चालक घेऊन एसटी सेवा देण्याचा पर्यायही महामंडळाने ठेवला आहे.