पिंपरी – राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्याने आता देवदर्शनासाठी वल्लभनगर आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळीत उत्पन्न खूपच कमी झाल्याने आगाराला मोठा फटका बसला आहे. यामुळे ही तूट भरुन काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
सोमवारपासून राज्यातील मंदिरे, पर्यटन सुरु झाल्याने विविध मार्गावर बसच्या फेऱ्यांचे वल्लभनगर आगारा कडून नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रवासी व उत्पन्न मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने कोल्हापूर, तुळजापूर, गणपतीपुळे, गाणगापूर, गोंदावले, नाशिक, अक्कलकोट या मार्गावर फेऱ्या सुरु झाल्या आहेत.
तर, गणेश चतुर्थी निमित्ताने अष्टविनायक दर्शन विशेष बस सुरु केली आहे. त्यासाठी शिवशाही, विना वातानूकुलित शयनयान, लाल परी या बसेस सोडण्यात येणार आहे. प्रवाशांना या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वल्लभनगर स्थानकप्रमुख पल्लवी पाटील यांनी केले आहे.