मुंबई – मागील महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आजअखेर हा संप संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय एसटी कर्मचारीच घेणार आहे. तत्पूर्वी ठाकरे सरकारकडून कर्मचाऱ्यांना 41 टक्क्यांपर्यंत पगारवाढ आणि एसटी महामंडळ फायद्यात आल्यानंतर इन्सेटीव्ह देण्याची घोषणा करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भातील माहिती दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
1 ते 10 वर्षे सेवा पूर्ण केलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारात थेट 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 41 टक्क्यांची आहे असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
दरम्यान विलीनीकरणाचा निर्णय समितीने राज्य शासनाला दिला तर तो आम्हाला मान्य असेल. सरकारने कामगारांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. जे कर्मचारी 1 ते 10 वर्षे या वर्गवारीमध्ये आहेत त्यात 5 हजारांपर्यंत वाढ करण्यात येत आहे. 41% ही वाढ करण्यात आली आहे.
10 ते 20 वर्षांपर्यंतच्या वर्गवारीमध्ये जे आहेत. 4 हजारांची वाढ केली आहे. 20 वर्षांच्या पुढे ज्यांची सेवा झाली आहे, त्यांच्या पगारात 2.5 हजारांची वाढ करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त डीए, घरभत्ता शासनाप्रमाणे देण्यात येत आहे. तसेच संपकरी आणि निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
दरम्यान पत्रकार परिषदेला उपस्थित गोपीचंद पडळकर यांनी संप मागे घेण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांची चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे कर्मचारी पगारवाढीवर समाधानी आहेत का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.