सातारा – एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या एस.टी संपावर अद्यापही काही संघटना ठाम आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून संपाची धग कमी होत असून, जिल्ह्यातील एसटी कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील 11 आगारांमध्ये एक हजारहून अधिक कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. संपात सुरवातीला चालक, वाहकांसह प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाल्याने, जिल्ह्यातील 11 डेपोंमधील बसेस जागेवरच उभ्या होत्या. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बसस्थानकांमधून होणारी वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी व राज्य शासनाच्या चार बैठका झाल्या.
यामध्ये कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ केल्याचे सांगण्यात आले, तरीही काही संघटनांनी विलीनीकरणावर ठाम राहत आंदोलन सुरुच ठेवले आहे. आता आंदोलनाचे वारे कमी होऊन, कर्मचारी कामावर हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही हळूहळू वाढ होणार आहे. कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर “मेस्मा’ अंतर्गत कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता.