मुंबई – राज्यात सुरू असलेल्या एसटी संपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीस एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी कर्मचारी आणि परिवहन मंत्री अनिल परबही उपस्थित होते. ही बैठकही निष्फळ ठरल्याने आजही संपाचा तिढा कायमच राहिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी सुद्धा चर्चा केली. फार काळ संप सुरू राहणे चांगले नाही. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून या समस्या निकाली काढाव्यात, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यानंतर मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या 7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत.
परिवहन मंत्र्यांचा इशारा
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले आहे. कर्मचारी कामावर हजर न झाल्यास नव्या कामगारांना सामावून घेण्याचे संकेत परिवहन मंत्री परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. अनिल परब म्हणाले, कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे परब म्हणाले.