पुणे – एसटीचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 8 नोव्हेंबरपासून पुकारलेला संप अद्यापही कायम आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर यादरम्यान, आतापर्यंत सुमारे 55 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील एसटीची आगारे आणि विभागीय कार्यशाळांतील कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवासी वेठीला धरले जात आहेत. एसटी धावत नसल्याने नागरिकांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाच्या आवाहनानंतरही कर्मचारी रुजू न झाल्याने आता कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर सुमारे 1 हजार 472 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. सध्या सुमारे 450 बसेस धावत असून, यामध्ये सुमारे 200 साध्या बसेसचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.