मुंबई : राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर मागील जवळपास महिना भरापासून राज्यातील एसटी कामगार संपावर आहे. कर्मचाऱ्याच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहेत. त्यातच एसटी कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यातील बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. या सर्वात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्या नंतर या संपाबाबत मोठे विधान केले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे म्हटले आहे. “शरद पवारांसोबत परबमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही आणि त्यानुसार शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले.
“एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांची एसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
“महाराष्ट्रतले वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागचा हेतू सर्वांना माहीत आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे हे आम्हाला माहीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी कालच्या बैठकीत काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत हे मला समजले,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.