कर्जत येथील तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वे गाड्यांवर परिणाम
मुंबई, ठाण्यावरून नियमित फेऱ्या व्यतिरिक्त 70 जादा गाड्या
पुणे – मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कर्जत या ठिकाणी तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी पुढील महिनाभर काही रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. ऐन दिवाळीच्या सणात रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस.टी. प्रशासनाने मुंबई व ठाण्यावरून पुणे मार्गावर नियमित फेऱ्या व्यतिरिक्त 70 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीच्या सणात बसस्थानक व रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र, रेल्वे मार्गात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प झालेला आहे.
दररोज मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी, शिवशाही, निमआराम व साध्या गाड्यांच्या सुमारे 465 फेऱ्या उपलब्ध होतात. मात्र, रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची बसस्थानकांवर गर्दी झाली आहे. या प्रवाशांना तत्काळ बस उपलब्ध होण्यासाठी व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे विभागाने 20, मुंबई 15, पुणे 15 तर, शिवनेरीच्या 20 अशा एकूण 70 जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी. प्रशासनाने दिली आहे.