एस.टी. कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस रजा घेण्याचा फतवा : वेतनही कापणार
पुणे – एस.टी. कर्मचाऱ्यांना रजेसाठी जाचक-अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. चालक-वाहकांसह सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी एक-दोन दिवसांच्या रजेसाठी सलग तीन दिवस रजा घ्यावी. तसेच, ती रजा बिनपगारी ठरवण्यात येईल, असे अजब परिपत्रक एसटी महामंडळाने काढले आहे.
राज्यातील विविध आगारांत सूचना फलकांवर अशा प्रकारचा आदेश लिहण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यास सुटी पाहिजे असल्यास तीन दिवसांची सुटी घेणे अनिवार्य केले आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर, विनापरवानगी गैरहजर राहिल्यास दीड हजारांचा दंड करण्यात येत असून याबाबत कामगार संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. एखादा कर्मचारी अचानक आजारी पडल्यास तो पूर्वपरवानगी गैरहजर राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
जाचक अटींचे परिपत्रक काढल्याने चालक-वाहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. परिपत्रकातील अटी-नियमांमध्ये अनधिकृत थांब्यावर बस थांबवणे गुन्हा, मोबाइलचा ऑन ड्युटी वापर शिक्षेस पात्र, सौजन्याचा अभावही गुन्हा, जास्त वेगात गाडी चालविल्यास बडतर्फ, प्रवाशांनी एखाद्या मार्गाकडे पाठ फिरवल्यास व तोटा झाल्यास चालक-वाहक कारणीभूत आदींचा बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामधील काही जाचक-अटी मागे घेण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. दरम्यान, आता या वाढत्या विरोधानंतर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एस.टी. प्रशासनाने सुट्यांबाबत काढलेल्या परिपत्रकामुळे कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामंडळ प्रशासनाने हे जाचक परिपत्रक तत्काळ मागे घेऊन कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करावी.
– मुकेश तिगोटे, पदाधिकारी, इंटक