मुंबई : यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 2200 बसेस मुंबईच्या गणेशोत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या 27 जुलैपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या वर्षापासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेदेखील आरक्षण एकाच वेळी म्हणजे 27 जुलैपासून करता येणार आहे.
28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बस स्थानके व बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बस स्थानकांवरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.