बसेस पूर्ण क्षमतेने धावणार : राज्यातील विभागांना आदेश
मास्क, सॅनिटायझर वापराचे बंधन कायम
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के आसन क्षमतेने धावणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) “लालपरी’ आता पूर्ण क्षमतेने धावणार आहे. राज्यातील विभागांना याबाबत गुरुवारी आदेश देण्यात आले. प्रवास करताना नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे बंधन कायम आहे.
करोना पार्श्वभूमीवर “एसटी’ची प्रवासी वाहतूक सुमारे 4 महिने बंद होती. 20 ऑगस्टपासून सोशल डिस्टन्स ठेवत आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांनुसार आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विभागांकडून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, एका आसनावर एकच नागरिक बसून प्रवास करू शकत होता.
याशिवाय, बसमध्ये केवळ 22 जणांना प्रवास करण्याची मुभा होती. कर्नाटक आणि गुजरात या राज्यांत 100 टक्के आसनक्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली असून, याच धर्तीवर रा.प. महामंडळाच्या बसेसद्वारे वाहतूक पूर्ण आसनक्षमतेने करण्यास मंजूरी दिली आहे. याबाबत महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी विभागांना आदेश दिले आहेत.
बसेसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करावे, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक करूनच मार्गस्थ कराव्यात, लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या (झिगझॅग) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरू होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रमाणे आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात यावीत, असेदेखील विभाग नियंत्रकांना सांगितले आहे.
संबंधित निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यात यावी. त्यानुसार मार्ग आणि फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्याच्या सूचना विभागांना दिल्या आहेत.