सततच्या अपघातांची प्रवाशांनी घेतली धास्ती
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वातानुकूलित “शिवशाही’ बसेसच्या अपघातांची प्रवाशांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. या बसचा सतत लहान-मोठा अपघात घडत असून अशा धोकादायक शिवशाहीतून प्रवास करण्यास प्रवासी धजावत नाहीत. त्यामुळे “शिवशाही’पेक्षा लालपरीच बरी, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
मागील महिन्यात पुण्यातून सांगलीला जाणारी “शिवशाही’ बस कात्रज घाट परिसरातील शिंदेवाडी येथे उलटली होती. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले. यासारखे राज्यभरात सतत अपघात होत आहेत. यामुळे धोकादायक “शिवशाही’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये सुरू केलेली ही सेवा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मात्र, वाढत्या अपघातांमुळे या सेवेला पोखरून काढले असून “शिवशाही’तून प्रवास करताना प्रवासी विचार करू लागले आहेत.
जून 2017 ते नोव्हेंबर 2019 या सव्वादोन वर्षांच्या कालावधीत “शिवशाही’चे राज्यभरात 550 लहान-मोठे अपघात झाले असून प्राणांतिक अपघातांनी अर्धशतक गाठले आहे. आतापर्यंत 51 प्राणांतिक, 371 गंभीर तर, 115 किरकोळ अपघात झाले आहेत. जून 2017 ते मार्च 2018 दरम्यान “शिवशाही’चे 83 अपघात झाले, त्यापैकी 7 प्राणांतिक व 67 गंभीर स्वरुपाचे होते. तर, एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान तब्बल 442 अपघात झाले असून 44 प्राणांतिक व 300 गंभीर स्वरूपाचे अपघात असल्याची, माहिती समोर आली आहे.