आळंदी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेचा निकाल शुक्रवार जाहीर झाला. शैक्षणिक वर्ष २०२० – २१ साठी शिक्षण मंडळाने मूल्यमापन पद्धती जरी बदलली असली तरीही शिक्षकांचे अध्यापन, परिश्रम व प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची जिद्द, अभ्यास व चिकाटी यामुळे श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज आळंदी प्रशालेचा गेल्या दोन वर्षांपासून १० वी चा १०० % निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यशाचे सर्वोच्च शिखर गाठले.
प्रशालेतील एकूण ३७२ विद्यार्थी एस. एस. सी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते. पैकी ६३ विद्यार्थी डिस्टींक्शन, १६७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त ठरले.
त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी ऋतुजा रमेश काचगुंडे ९८.६०%, द्वितीय क्रमांक कुमार योगेश विश्वास सावंत व कुमारी तनया प्रमोद दिवटे ९४.६० % तर तृतीय क्रमांक कुमारी ज्ञानेश्वरी गणेश तौर ९४.४० % गुण प्राप्त करून या गुणवंतानी प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
त्यानिमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयातील दिव्यांग (अंध) युनिटचा निकाल परंपरागत याही वर्षी १००% लागला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सतत प्रयत्नशील असणारा गुणवत्ता विभाग, त्या अंतर्गत उपक्रमशील गुणवत्तावाढ समिती, समितीचे पर्यवेक्षक सुर्यकांत मुंगसे, समिती प्रमुख नारायण पिंगळे , समन्वयक अनुज्यायिनी राजहंस तसेच त्यांच्या समवेत अविरत प्रयत्न करणारे सर्व वर्गशिक्षक, विषयशिक्षक, मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक दिपक मुंगसे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे व इतर सर्व विश्वस्त, सदस्य व पालक यांनी भरभरून अभिनंदन केले.
संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, दिपक मुंगसे, हेमांगी कारंजकर यांनी एस. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये शाळेचा निकाल सलग दोन वेळा १०० % लागल्यामुळे यशस्वी विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच शालेय निकालाचा चढता आलेख व संस्था / शाळा यांचेकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयी विचार व्यक्त केले.
तसेच गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी आपल्या मनोगतातून संस्था व प्रशालेतील सर्व घटकांचे आभार व्यक्त केले. जर बोर्डाने रितसर परीक्षा घेतली असती तर यापेक्षाही चांगले गुण प्राप्त झाले असते अशी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उदमले यांनी केले व उपस्थितांचे आभार सुदाम मोरे यांनी व्यक्त केले.