पुणे – काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी सुरू असताना किंवा त्यापूर्वी येणाऱ्या पावसामुळे होणारा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो. त्यामुळे पावसाचा आनंद जसा शेतकऱ्यांना होतो तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही. ते शेतकरी आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही अशी बोचरी टीका खासदार श्रीनिवास पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केली.
सेनापती बापट रस्त्यावरील पत्रकार नगर समोरील शिवाजी सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सातारा लोकसभा निवडणुकीविषयी गप्पा मारल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा प्रचंड गाजली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर टोलेबाजी करताना “पावसात भिजण्याचा आमचा आनंद कमी पडला’ असा टोला लगावला होता. त्याविषयी पाटील यांनी वरील टीकात्मक उत्तर दिले आहे.