नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
चीनकडून अचानक झालेल्या या आक्रमक कृतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-लेह महामार्गावरुन सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. संरक्षण दले आणि त्यांच्या वाहनांसाठी फक्त हा मार्ग खुला असेल. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन काही भागातून मागे हटला होता. पण पँगाँग टीएसओमध्ये चिनी सैन्य तळ ठोकून होते. त्यामुळे या भागात संघर्षाच भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. अखेर २९-३० ऑगस्टच्या रात्री पुन्हा ही घटना घडली. “भारतीय लष्कर संवादाच्या माध्यमातून शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे मात्र याचवेळी देशाच्या प्रादेशिक अखंडतेची सुरक्षा करण्यासाठीही तितकंच कटिबद्ध आहे,” असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.