बंगलुरू – अयोध्या प्रकरणात एक मध्यस्थ म्हणून काम करणारे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या निकालामुळे दोन्ही समाजातील लोकांना समाधान आणि आनंद वाटणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. मी निश्चींत मनाने या निकालाचे स्वागत करतो असे त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा विषय अंतिम सुनावणीसाठी घेण्याच्या आधी हिंदु आणि मुस्लिमांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी तीन जणांची एक मध्यस्थांची समिती नेमली होती. त्यात श्री श्री रविशंकर यांचा समावेश होता.
पण त्या मध्यस्थीत त्यांना यश आले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्याच्याही आधी श्री श्रींनी स्वत:हून दोन्ही समुदायाच्या प्रमुखांशी संपर्क साधून त्या वादात संवाद घडवून आणण्याचे प्रयत्न हाती घेतले होते.