उमेदवारी मागे घेण्याची आज अंतिम मुदत; चित्र स्पष्ट होणार
फलटण – येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतून आज 30 उमेदवारांनी माघार घेतल्याने असून तिघांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस उद्या, दि. 5 रोजी असून सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातून विद्यमान चेअरमन डॉ बाळासाहेब शेंडे, संस्था प्रतिनिधी प्रवर्गातून चंद्रकांत दत्ताजीराव पवार व अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातून अशोक दादू सोनवणे यांचेच अर्ज राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडी निश्चित झाल्या आहेत.
याबाबतची औपचारिक घोषणाच बाकी असून सत्ताधारी राजे गटाने विजयाचा शुभारंभ केला आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 82 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा समावेश आहे. व्यक्ती उत्पादक गटातील होळ-गिरवी गटात आठ, जिंती-राजाळे व फलटण-विडणी गटांमध्ये प्रत्येकी 11, गुणवरे-निंबळक गटात 19, आसू-शिंदेवाडी गटात 13, “ब’ वर्ग गट व अनुसूचित जाती-जमाती गटात प्रत्येकी दोन, महिला राखीव गटात सात, इतर मागास गटात तीन, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटात सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
त्यापैकी 30 जणांनी आज माघार घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उद्या (बुधवार) दुपारी 3 नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. आवश्यकता भासल्यास रविवार, दि. 16 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निंबधक (सहकारी संस्था) सुनील धायगुडे यांनी दिली.