लंकेच्या मंत्र्यांनी दिला दहशतवादाचा दाखला
कोलंबो: पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंनी भारताच्या दबाबात आपली भूमिका मांडली आहे, अशी कुरघोडी करण्याचा पाकने प्रयत्न केला. परंतु श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करत श्रीलंकन खेळाडूंवर भारताचा कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट करत ज्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यातून माघार घेतली त्यांनी 2009 मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2009 मध्ये पाक दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंवर दबाव टाकल्याचा दावा खोडून काढला. हॅरिन फर्नांडो यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, पाक दौऱ्यापासून दूर रहाण्यासाठी श्रीलंकन खेळाडूंवर भारताने दबाव आणल्याच्या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
2009 मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यांच्या भूमिकेचा आम्ही आदर करतो. जे खेळाडू पाक दौऱ्यात सहभागी होण्यासाठी राजी आहेत त्यांच्यासह श्रीलंकन संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज आहे. प्रमुख खेळाडूंशिवाय पाकिस्तान दौऱ्यासाठी निवडलेला संघ क्षमतेने भरलेला असेल. हा संघ पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला नमवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.