जागतिक क्रिकेट विश्वातील “मिनी वर्ल्डकप’ म्हणून उल्लेख होत असलेल्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करून सहाव्यांदा हा करंडक जिंकण्याचा अभिनंदनीय विक्रम केला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांना या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते; पण भारत या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच बाद झाला आणि पाकिस्तानला अंतिम सामनामध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे श्रीलंका संघाला पुन्हा एकदा आशियाई विजेता होण्याचा मान मिळाला.
क्रिकेट विश्वातील अशा प्रकारच्या बहुद्देशीय स्पर्धेतील विजय निश्चितच महत्त्वाचे असतात. पण श्रीलंका क्रिकेट संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा आहे. कारण सध्या बिकट परिस्थितीमधून आणि विशेषतः मनःस्थितीमधून श्रीलंका हा देश जात आहे. अशावेळी या प्रकारचा एखादा विजय निश्चितच सर्वांना उभारी देणारा ठरणार आहे. मुळात आशियाई करंडक स्पर्धा श्रीलंकेत होणार होती; पण श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणी आणि इतर काही घटनांमुळे ही स्पर्धा दुबईमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाने श्रीलंकेचा दारूण पराभव केल्यामुळे बहुतेक सर्व क्रिकेट पंडितांनी या स्पर्धेत श्रीलंकेचे आव्हान लवकरच संपुष्टात येईल, अशी भविष्यवाणीही केली होती. प्रत्यक्षात त्यानंतरचे सलग पाच सामने जिंकून श्रीलंकेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि आशिया करंडकावर नाव कोरले. या संघामध्ये कोणतेही स्टार्स किंवा सुपरस्टार नाहीत, तरीही या संघाने अनेक स्टार्स आणि सुपरस्टार असलेल्या भारत-पाकिस्तान यासारख्या संघांना धूळ चारून या करंडकावर आपले नाव कोरले, ही निश्चितच श्रीलंकेसाठी भूषणावह गोष्ट मानावी लागेल.
नवख्या संघाकडून पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतरही श्रीलंका क्रिकेट संघाने फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले, ही गोष्ट निश्चितच महत्त्वाची आहे. आणखी काही महिन्यांनी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आता श्रीलंका निश्चितच प्रबळ दावेदार म्हणून मानला जाऊ शकतो. या देशाचा सध्याचा जो क्रिकेट संघ आहे तो तरुण आहे आणि चुका करत करत शिकत आहे. कोणत्याही एका विशिष्ट खेळाडूवर या संघाची मदार नसल्यानेच प्रत्येक खेळाडूला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यातूनच अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कामगिरी घडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यापूर्वी जेव्हा पाच वेळा श्रीलंकेने आशिया करंडक जिंकला होता तेव्हा त्या संघामध्ये स्टार खेळाडू आणि सुपरस्टार खेळाडूंचा भरणा होता. पण आता श्रीलंकेला ज्या संघाने हा विजय मिळवून दिला आहे तो संघ गुणवान आणि उपयुक्त खेळाडूंचा असल्यामुळेच श्रीलंकेला हा विक्रम करता आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत यासारख्या सुपरस्टारचा भरणा असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या फेरीतच या स्पर्धेमध्ये गारद व्हावे लागले. बाबर आजम किंवा रिजवान यांच्यासारख्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या पाकिस्तानला सलग दोन सामन्यांत पराभूत करण्याचा विक्रम श्रीलंका संघ करू शकला. यामागे या संघाची गुणवत्ता हेच एकमेव कारण आहे.
भारतीय संघामध्ये रोहित, विराट यांच्या बाद होण्यानंतर जी एक प्रकारची पराभूत मानसिकता तयार होते किंवा पाकिस्तान संघातसुद्धा बाबर आजम किंवा रिजवान खेळला नाही तर पाकिस्तानची जी गत होते तशी कोणतीही स्थिती श्रीलंका संघाबाबत होत नसल्यानेच कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची हातोटी या संघाने साधली आहे. त्याच हातोटीचा वापर करून त्यांनी अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला. खरे तर 5 बाद 70 च्या आसपास धावसंख्या असताना श्रीलंका संघ फार तर 120 ते 130 धावा करेल, असे वाटले होते. पण राजपक्षेसारख्या एका तरुण गुणवान फलंदाजाने संपूर्ण सामना फिरवून टाकला. नंतर श्रीलंकेच्या गुणवान आणि उपयुक्त गोलंदाजांनीही पाकिस्तानी फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. या स्पर्धेनंतर काही दिवसांतच आता टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने आपल्या या विजयाने श्रीलंकेने इतर सर्व प्रबळ दावेदार संघांना निश्चितच एक संदेश देण्याचे काम केले आहे.
विशेषतः कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रबळ दावेदार असल्याचे नाव नेहमी ज्या भारतीय संघाचे घेतले जाते त्या भारतीय संघालाही आता आपल्या संघाच्या पुनर्बांधणीचा विचार करावा लागणार आहे. आशियाई संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेमध्ये जर भारताला दुसऱ्या फेरीत गारद व्हावे लागले असेल तर विश्वचषक स्पर्धेमध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यासारख्या देशांशी खेळताना भारताला आपली गुणवत्ता किती वाढवावी लागणार आहे, याचा विचार आशियाई क्रिकेट स्पर्धेतील अपयशाने निश्चितच करावा लागणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असली, तरी एखादं-दुसरा सामना वगळता कोठेही पाकिस्तानचे खेळाडू आत्मविश्वासाने खेळले असे झाले नाही. सामन्यात विजय जरी मिळवला असला तरी पाकिस्तानला झगडावे लागले होते.
साहजिकच आशिया करंडकाच्या या निकालाने भारत आणि पाकिस्तान या महत्त्वाच्या दावेदारांना जागे करण्याचे काम निश्चितपणे केले आहे. क्रिकेटमध्ये श्रीलंकेने एकेकाळी आपले वर्चस्व गाजवले होते. एक स्पर्धात्मक संघ म्हणून या संघाकडे पाहिले जाते; पण सध्या श्रीलंका देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीमध्ये श्रीलंका संघाने मिळवलेला विजय या संघालाच नव्हे तर संपूर्ण देशालाही उभारी देणारा ठरणार आहे. श्रीलंकेने या स्पर्धेत सुमार कामगिरी केली असती तरी कोणीही या संघाला जबाबदार धरले नसते; पण या परिस्थितीतही श्रीलंकेच्या खेळाडूंनी जो बहारदार खेळ केला तो निश्चितच अभिनंदनास पात्र मानावा लागेल.