नवी दिल्ली – मेट्रो मॅन म्हणून प्रख्यात असलेले तंत्रज्ञ ई श्रीधरन यांनी भाजप मध्ये प्रवेश करून त्या पक्षाच्या मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली असली तर श्रीधरन यांचा केरळातील जनतेवर फारच कमी प्रभाव पडेल.
मुळात भारतीय जनता पक्ष केरळातील विधानसभांच्या स्पर्धेतच नाही असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. गेल्या विधानसभेत भाजपला या राज्यात केवळ एक जागा मिळाली आहे. यंदाहीं त्यापेक्षा अधिक चांगली कामगीरी त्यांना नोंदवता येणार नाही असेही शशी थरूर यांनी नमूद केले.
श्रीधरन यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेने आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसला असे त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले. श्रीधरन यांनी आपले सारा आयुष्य अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये घालवले आहे. त्या मानाने राजकारण हे अगदीच वेगळे क्षेत्र आहे.
तेथे त्यांना आपला प्रभाव दाखवता येणे अशक्य आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आणि अभ्यास नसल्याने त्यांना येथील राजकारणात काही चमकदार कामगिरी करता येणार नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की मी जेव्हा वयाच्या 53 व्या वर्षी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी खूप उशिर केला असे मला वाटले होते.
इतक्या वयात राजकारणात प्रवेश करूनही मला येथे नीट प्रभाव पाडता आलेला नाही पण श्रीधरन यांनी वयांच्या 88 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना येथे फार काही करता येईल असे वाटत नाही असे ते म्हणाले. श्रीधरन यांची राजकारण प्रवेशाची घोषणा हीच एक मोठी घोषणा होती. त्यापेक्षा अधिकचा प्रभाव त्यांना टाकता येणार नाही असे ते म्हणाले.