सिडनी – मार्नस लेबूशेन व पदार्पण साजरे करत असलेल्या विल्यम्स पुतोव्हस्की यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 2 गडी गमावून 166 धावा केल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे दिवसातील जवळपास 35 षटकांचा खेळ वाया गेला.
टीम पेनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज महंमद सिराजने त्यांचा धडाकेबाज सलामीवीर व संघात पुनरागमन केलेल्या डेव्हिड वॉर्नरला केवळ 5 धावांवर तंबूत धाडून थाटात सुरुवात केली. मात्र, त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली आणी खेळ थांबवावा लागला. दुसऱ्या सत्रात खेळ सुरू झाल्यावर लेबूशेन व पुकोव्हस्की यांनी डाव सावरला मात्र, अत्यंत संथ फलंदाजी केली.
पुकोव्हस्कीने पदार्पणाचा सामना खेळताना भारतीय गोलंदाजांना एक संधी दिली होती. मात्र, रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक ऋषभ पंतने सोपा झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. या संधीचे सोने करताना पुकोव्हस्कीने अर्धशतक फटकावले.
लेबूशेन व पुकोव्हस्की यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. त्यावेळी भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केलेल्या वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने पुकोव्हस्कीला बाद करत ही जोडी फोडली. त्यावेळी यजमानांच्या 2 बाद 106 धावा झाल्या होत्या. त्यानंतर या मालिकेत सातत्याने अपयशी ठरत असलेल्या स्टिव्ह स्मिथने लेबूशेनला सुरेख साथ देत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. त्यावेळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
दिवसातील अखेरचे सत्र सुरू झाल्यावर या जोडीने धावफलक हलता ठेवला व दिवसातील उर्वरित षटके खेळून काढताना संघाला 2 बाद 166 धावसंख्या उभारून दिली. लेबूशेननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. पावसाच्या व्यत्ययाने दिवसाच्या खेळातील जवळपास 35 षटकांचा खेळ वाया गेला. खेळ थांबला तेव्हा लेबूशेन 67 तर, स्मिथ 30 धावांवर खेळत होते. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 60 धावांची अखंडित भागीदारी केली.
भारताकडून महंमद सिराज व नवदीप सैनी यांना प्रत्येकी एक गडी बाद केला. दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरकडून आक्रमक सलामी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सिराजने त्याला बाद करत भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण केल्यामुळेच लेबूशेन व पुकोव्हस्की यांना जीवदान मिळाले.
खेळपट्टीचा रंग फिरला
या सामन्यासाठी ग्रीनटॉप खेळपट्टी राखण्यात आली होती. पावसाळी वातावरण व हवेतील गारवा यांचा लाभ भारतीय गोलंदाजांना नाणेफेक गमावल्यानंतरही मिळेल असे वाटले होते. मात्र, पहिल्या सत्रानंतर खेळपट्टीने रंगच बदलला. या खेळपट्टीवर फलंदाजांच्या बॅटवर चेंडू सहज येत होता. वातावरण पोषक असूनही जसप्रीत बुमराह, महंमद सिराज व नवदीप सैनी यांना स्विंग मिळत नव्हता. त्यामुळेच पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना वर्चस्वच राखता आले नाही.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 55 षटकांत 2 बाद 166 धावा. (डेव्हिड वॉर्नर 5, विल्यम्स पुकोव्हस्की 72, मार्नस लेबूशेन खेळत आहे 67, स्टिव्ह स्मिथ खेळत आहे 30, नवदीप सैनी 1-32, महंमद सिराज 1-46).