साउदम्पटन -भारतीय संघाचे सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद भूषवण्याची कामगिरी आता विराट कोहलीच्या नावावर नोंदली गेली आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या कामगिरीला मागे टाकले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहली नाणेफेकीसाठी मैदानात उतरला तेव्हाच हा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. कोहलीने 61 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.
यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. त्याने 60 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. धोनीच्या कर्णधारपदाखाली भारताने 27 कसोटी सामन्यात विजय, तर 18 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने 36 कसोटी सामन्यात विजय, तर 14 कसोटी सामन्यात पराभव अशी चमकदार कामगिरी केली आहे.
साडेसात हजारी मनसबदार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 44 धावांवर बाद झाला असला तरीही त्याच्या नावावर एका अनोख्या कामगिरीची नोंद झाली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार 500 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत कोहलीनेही स्थान मिळवले आहे. कोहलीने 92 कसोटीत 154 डाव खेळताना ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा कोहली सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.