वॉर्सेस्टर – प्रियम गर्ग याने केलेले नाबाद शतक हेच भारताच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. त्यांनी येथे सुरू असलेल्या तीन देशांच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशवर 35 धावांनी मात केली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 264 धावा केल्या. त्यामध्ये गर्गने 7 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 6 चौकार व एक षटकारासह 63 धावा केल्या. धृव जुरेल (34), तिलक वर्मा (23) व प्रज्ञेश कणपिल्लेवार (23) यांनीही भारताच्या धावसंख्येत वाटा उचलला. बांगलादेशकडून मृत्युंजय चौधरी याने 45 धावात 2 विकेट्स घेतल्या.
कर्णधार अकबर अली (56), शमिम हुसेन (46) व तान्झिद हसन (44) यांनी बांगलादेशला विजयी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, भारताच्या कार्तिक त्यागी (4-16) व शुभांग हेगडे (3-59) यांच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा डाव 229 धावांमध्ये कोसळला. भारताकडून रवी बिश्नोई याने दोन गडी बाद करीत त्यांना चांगली साथ दिली.
भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला होता. भारताचा बांगलादेशबरोबर पुन्हा शनिवारी सामना होणार आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत : 50 षटकांत 5 बाद 264 (प्रियम गर्ग नाबाद 100, यशस्वी जैस्वाल 63, धृव जुरेल 34, तिलक वर्मा 23, प्रज्ञेश कणपिल्लेवार 23, मृत्युंजय चौधरी 2-45)
बांगलादेश : 47.1 षटकांत सर्वबाद 229 (अकबर अली 56, शमिम हुसेन 46, तान्झिद हसन 44, कार्तिक त्यागी 4-16, शुभांग हेगडे 3-59, रवी बिश्नोई 2-53)