क्रीडामंत्री रिजीजू यांनी दिले संकेत
नवी दिल्ली – देशात “खेलो इंडिया’ योजनेचे जाळे प्रत्येक जिल्ह्यात असावे, असे मत व्यक्त करताना केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी पहिल्या टप्प्यात 1 हजार केंद्रे सुरू करण्याची योजना असल्याचेही जाहीर केले.
“खेलो इंडिया’ मोहीम जेव्हापासून सुरू करण्यात आली तेव्हापासूनच देशातील क्रीडाक्षेत्राला त्यातून सेकंड बेंच मिळावा, हाच हेतू होता. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत जिल्हा पातळीवरही अव्वल खेळाडू तयार व्हावेत यासाठी या योजनेला अंदाजपत्रकातही तरतूद करण्यात आली. आता आगामी दहा वर्षांचा कालावधी समोर ठेवताना या योजनेची कक्षा रूंदावणे अत्यंत आवश्यक आहे. सध्यातरी किमान 1 हजार केंद्रे स्थापन करून जिल्हास्तरावर ती कार्यरत केली जातील. देशाच्या लोकसंख्येत सर्वात जास्त टक्का तरुणांचा आहे त्यामुळे त्यांच्यात क्रीडा संस्कृती रुजावी व त्यातून देशाला उत्तमोत्तम खेळाडू मिळावेत हेच मुख्य उद्दिष्ट आहे, असेही रिजीजू यांनी सांगितले.
माजी खेळाडूच बनणार प्रशिक्षक….
देशात अनेक खेळाडू असे आहेत की जे निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ नवोदितांना व्हावा यासाठी याच माजी खेळाडूंमधून सर्वोत्तम प्रशिक्षक घडावेत, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे देशाला भक्कम सेकंड बेंच मिळेल, असा विश्वासही रिजीजू यांनी व्यक्त केला.