– अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी हिटमॅन रोहित शर्मा याला संघाबाहेर ठेवणारी भारतीय संघाची निवड समिती आता वादात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. नियमित कर्णधार विराट कोहली याला चौथ्या व पाचव्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाणार असून या दोन सामन्यांसाठी रोहित शर्माला कर्णधार केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याला निवड समितीची बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी का.
परिस्थिती भिन्न असली तरी अनेक वर्षांपूर्वी माजी कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ यांच्याबाबतही अशीच घटना घडली होती व जेव्हा त्यांना कामगिरी करण्यात अपयश आले होते त्यावेळी त्यांना संघातून डच्चू दिला गेला व काही दिवसांतच त्यांची पुन्हा संघात निवड केली गेली व त्यांच्याकडे संघाचे उपकर्णधारपदही दिले गेले होते. तसेच पुन्हा सुमार कामगिरीनंतर त्यांना पुन्हा डच्चू दिला गेला होता. यामुळे व्यथित झालेल्या मोहिंदर यांनी निवड समिती आहे का बंच ऑफ जोकर्स असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. जे त्यांच्याबाबत घडले तेच रोहित बाबतही घडताना दिसत आहे.
रोहितला दोन्ही टी-20 सामन्यांत संधी दिली नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यातही रोहितला संधी मिळेल असे खात्रीलायकपणे सांगितले गेले. कोहलीला विश्रांती दिली गेली तर उर्वरीत दोन्ही सामन्यांसाठी रोहितकडेच नेतृत्व दिले जाईल. रोहित कर्णधार झाल्यावर लोकेश राहुलला संघातील स्थान गमवावे लागेल. रोहितबरोबर सलामीला इशान किशन फलंदाजी करेल हे देखील स्पष्ट आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला फलंदाजीला पाठवले जाइल.
चौथ्या क्रमाकांवर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तर, पाचव्या क्रमाकांवर श्रेयस अय्यर फलंदाजी करेल. मुळात प्रश्न हा निर्माण झाला आहे की, जर रोहितला धवनसाठी संघाबाहेर ठेवले गेले का हे निवड समितीला विचारावे लागेल. कारण धवन भारतीय संघाचा जावई आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. कामगिरी सरस असो किंवा नसो त्याचे संघातील स्थान कायम राहते. केवळ यावेळी तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता; पण विजय हजारे स्पर्धेत काहीही चमकदार यश मिळवलेले नसतानाही त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील सलामीच्या सामन्यात खेळवले गेले. तिथे अपयशी ठरल्यावर राहुलला संधी दिली; पण त्यानेही निराशा केली.
आता रोहितला संघाबाहेर ठेवण्याने निवड समितीवर टीका होऊ लागल्याने सुबुद्धी सुचली व त्याला दुसऱ्या सामन्यात संघात घेतले गेले. आता कोहलीला विश्रांतीची गरज आहे का हा देखील एख प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याने पहिल्या कसोटीनंतर विश्रांती घेतली होती. या मालिकेतही त्याला फारशा धावा करता आलेल्या नव्हत्या.
दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याची बॅट तळपली. मग त्याला जास्तीत जास्त सामने खेळवणे संघहित नव्हे का. विनाकारण आम्ही काहीतरी सेकंड बेंच वगैरे तयार करत आहोत हे दाखवण्याचा निवड समितीचा दुबळा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे. कोहलीला विश्रांती देतानाच धवन व राहुलला बाहेर ठेवत रोहितला संधी द्यायची, त्याच्याचकडे संघाचे नेतृत्वही द्यायचे मग मुळात भरात असताना रोहितला पहिल्या दोन्ही सामन्यांत का खेळवले गेले नाही.
राहुलचे ठिक आहे, त्याने आधी धावा केल्या आहेत म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला गेला असे एकवेळ म्हणू शकतो पण धवनने असे काय दिवे लावले होते की त्याला खेळवण्यासाठी प्रमुख फलंदाजांला संघाबाहेर ठेवले गेले. कोहली व रोहितमधून विस्तवही जात नाही असे सांगतात ते अशा घटनांनी खरेच वाटू लागते. एका रेघेला हात न लावता दुसरी रेघ मोठी करण्याचेच हे उद्योग नव्हे का.