जगभरात सर्वत्र, सर्व आर्थिक स्तरांतील लोकसंख्या झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकत चालली आहे. भारतामध्ये साठी ओलांडलेल्या व्यक्तींचे प्रमाण आजघडीला एकूण लोकसंख्येच्या 9% आहे. (2011 च्या जनगणनेनुसार) हे प्रमाण 2025 वर्षांपर्यंत 11% होईल, तर 2050 पर्यंत 20 वर पोहोचेल, असा अंदाज आहे.
वृद्धापकाळातही चांगल्या दर्जाचे आयुष्य जगण्याच्या संधी मिळणे आणि सक्रिय राहणे या गोष्टींसाठी आरोग्य चांगले हवे. जागतिक आरोग्य परिषदेच्या ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड ऍक्शन प्लॅन ऑन एजिंग अँड हेल्थ या वृद्धत्व आणि आरोग्यासंबंधीच्या जागतिक धोरणामध्ये अशा एका आरोग्यदायी, सहजप्राप्य आणि आधारदायी वातावरणाची गरज मांडण्यात आली आहे, जिथे लोक त्यांच्यासाठी सुयोग्य अशा जागी आयुष्याचा उत्तरार्ध घालवू शकतील व त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी करू शकतील.
वयोवृद्धांचे स्वावलंबन जपण्यासाठी उत्तम प्रकृती आणि हिंडण्या-फिरण्याची क्षमता या गोष्टी अत्यावश्यक आहेत. शरीर साथ देईनासे झाले की, वयोवृद्ध मंडळींचे स्वातंत्र हिरावले जाते, जगण्याचा दर्जा घसरतो, पडल्याने इजा होतात व समाजाशी असलेला संबंध तुटल्याने एकाकीपणा वाट्याला येतो. खरे तर पडणे- धडपडणे व त्यातून होणाऱ्या दुखापती ही वयोवृद्धांना भेडसावणाऱ्या काही सर्वाधिक गंभीर आणि सर्रास आढळून येणाऱ्या वैद्यकीय अडचणी आहेत.
वयोवृद्ध मंडळींवर प्रामुख्याने परिणाम करणाऱ्या स्ट्रोक किंवा डिमेन्शियासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या विकारांमुळे मज्जासंस्था अकार्यक्षम होते व त्यातून वृद्धांच्या स्मरणशक्तीवर, एकाग्रतेवर परिणाम होतो, त्यांना एकटे पडल्यासारखे वाटते व निराशेची भावना मनात घर करते.
नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हेनुसार महानगरांमध्ये व वयोवृद्ध नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे. धकाधकीच्या, शहरी जगामध्ये वृद्धांची जीवनशैली आणि दैनंदिन जगण्यावर अधिकची बंधने येतात. मात्र, काही विशिष्ट पद्धती आणि ग्रुप थेरपीच्या माध्यमातून काही गोष्टी साधणे शक्य आहेत:
-अवधान देण्याची क्षमता आणि एकाग्रतेमध्ये सुधारणा
-शारीरिक बळ, शरीराचा तोल आणि कार्यक्षमता यांत वाढ
-पडणे व त्यामुळे होणाऱ्या दुखापतींना आळा
-आत्मविश्वासामध्ये वाढ व समाजात मिसळण्यास प्रोत्साहन
-एकूणच जगण्याचा दर्जा वाढणे.
आजारपण आणि अपंगत्वाचा प्रभाव कमी करत वृद्धापकाळाला उमदेपणाने सामोरे जायचे तर लवचिकता हवी, बदल स्वीकारण्याची तयारी हवी आणि स्वत:वर प्रेम हवे.
वयोवृद्धांचे कुटुंबीयांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने न्यूरोसायकोलॉजी व फिजिओथेरपी तज्ज्ञांनी संयुक्तपणे एक खास वृद्धोपचार कार्यक्रम तयार करणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम आरोग्यपूर्ण वृद्धत्वाचे लक्ष्य साध्य करण्याच्या कामी मदत करेल. गटपद्धतीने राबविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात संज्ञानात्मक कार्य (कॉग्निटिव्ह फंक्शनिंग), मनोवस्था (मूड्स) आणि शरीराचे कार्य अशा वेगवेगळ्या पैलूंचा सर्वसमावेशक पद्धतीने विचार केला जाईल. त्यातून वयोवृद्धांची कामगिरी, आत्मविश्वास आणि एकूणच जगण्याचा दर्जा यात सुधारणा घडवून आणता येते.
आरोग्यपूर्ण वृद्धत्वासाठीच्या डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा कार्यक्रमाद्वारे प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे अशा व्यक्तींना या कार्यक्रमात सामील करून घेतले जाते आणि वयोवृद्ध मंडळींच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर समाधान शोधण्यासाठी व्यक्तीपातळीवर समस्या समाधान केले जाते.
अशा समाजाधारित कार्यक्रमांना हजेरी लावणेही ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभदायक ठरते.
अशा कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये, खेळसत्रांमध्ये नाव नोंदविल्यामुळे सामाजिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारा व आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचे अनेक मार्ग धुंडाळण्याची मुभा देणारा एक समाजगट तयार करणे वयोवृद्धांना शक्य झाले आहे. उतारवय गाठलेल्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांसाठी आपल्या देशाला तयार करणे आणि वयोवृद्धांना अर्थपूर्ण पद्धतीने गुंतवणे, जेणेकरून ते आत्मनिर्भर राहतील आणि आपल्या कौटुंबिक आयुष्य व समाजाला योगदान देऊ शकतील.
हे लक्ष्य साध्य करायचे तर अपेक्षित लोकसंख्या गटापर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचू शकतील, उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त वापर करून घेतील व वाजवी खर्चात उपलब्ध होती असे सुरक्षित कार्यक्रम विकसित केले जायला हवेत. केवळ वयोवृद्धांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्हे तर त्यांचे आयुष्य सुरळीतपणे सुरू राहील याची काळजी वाहणे हे अशा कार्यक्रमांचे उद्दिष्ट असायला हवे.