मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे गट एकत्र आले असले तरी स्थानिक पातळींवर मात्र काही चित्र उलट दिसत आहे. कारण वर्षभरापूर्वी भाजपाला रामराम ठोकत तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यात नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांचा समावेश होता. या सर्वानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता या तिघांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिघा विभागात प्राबल्य असलेले गवते परिवार एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवक होते. गणेश नाईक यांनी या तीन नगरसेवकांना भाजपात घेत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपा आणि एकनाथ शिंदे गट एकत्र आल्यानंतर ही पहिलीच घटना आहे. सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेला गोंधळही यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली.
शिवसेनेच्या 40 आणि दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेरीस पद सोडावं लागलं. यानंतर आठ दिवसांनी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपचे देवेंद्र फडणवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.