नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च नायायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. ५ सदस्यीय घटनापीठाकडे आज अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. आमदारांची अपात्रता त्यासोबतच शिवसेना कोणाची ? निवडणूक आयोग निर्णय पद्धती या सर्व गोष्टीबाबत आज न्यायालय काय भाष्य करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आज सुनावणी सुरु झाली. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने कोर्टासमोर आपले म्हणणे मांडले. यावेळी सिब्बल यांनी १० व्या सूचीचा उल्लेख करत शिंदे गटाला सध्या स्टेटस काय ? असा सवाल करत त्यांना विलीन व्हावेच लागेल असा सूतोवाच केला.
सिब्बल यांनी विलीनीकरणाबाबत मांडले महत्वाचे मुद्दे
शिंदे गटाला कारवाईपासून वाचायचं असेल तर त्यांना इतर पक्षात विलीन व्हावं लागेल.
परंतु कागदोपत्री त्यांनी विलीनकरणाबाबत शिंदे गटाने निर्णय घेतला नाही.
त्यामुळे दहाव्या सूचीनुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी.
दोन तृतीयांश गट फुटला तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवता येत नाही. त्यांना इतर पक्षात विलीन व्हावे लागते.
तर बहुमत आमच्या बाजूने आहे. इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे मूळ पक्ष आमचाच आहे असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे.न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होत आहे.