सिंहगडरस्ता (जयंत जाधव) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ स्वामीनारायण मंदिरासमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पीड कॅमेरा बसवला आहे. याद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, या परिसरात अपघात वाढत असताना प्रशासन फक्त दंड वसुलीत धन्यता मानत आहे. यात मागील 7 महिन्यांत तब्बल 8 कोटी रुपये ‘वसुली’ करण्यात आली आहे. त्यामुळे अपघात रोखण्याऐवजी ही यंत्रणा पैसे छापण्यासाठी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सेव्ह लाइफ फाउंडेशन या विनाशासकीय संस्थेच्यामदतीने हा स्पीड कॅमेरा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने बसवला आहे. या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्ती, गती मर्यादा, चिन्हे याबद्दलची कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करते. दरम्यान, मागील काही महिन्यांत नवले पूल हा अपघातांचा “हॉटस्पॉट’ ठरला आहे. हे सत्र रोखण्यासाठी आतापर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. यातच काही महिन्यांपूर्वी स्वामीनारायण मंदिराजवळ स्पीड कॅमेरा बसवण्यात आला आहे. परंतु तो उतारावर बसवल्यामुळे तसेच सूचना फलकही अगदी कॅमेराजवळच असल्याने वाहनधारकांच्या ते लक्षात येत नाही. तीव्र उतारामुळे वाहने वेगात येतात. याबाबत माहिती दीनानाथ धुरी यांनी मागवली असता, वाहतूक अपर पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून धुरी यांना ही माहिती मिळाली. 10 जून 2022 ला हा कॅमेरा बसवण्यात आला. सात महिन्यांमध्ये या कॅमेराद्वारे 1 लाख 80 हजार 44 वाहनधारकांना साधारण 36 कोटी रुपयांची चलने पाठवण्यात आली. त्यापैकी 41 हजार 171 जणांनी दंड भरला. म्हणजे साधारणपणे आठ कोटी रुपये या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जमा झाले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महामार्गावर अपघात मात्र जैसे थे आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. पण, प्रशासनाने स्पीड कॅमेरा तीव्र उतारावर लावला आहे. त्याची वेगमर्यादा 60 कि.मी. ठेवण्यात आली आहे. याबाबतचा फलक 500 मीटर अंतरावर आहे. प्रत्यक्षात तो एक ते दीड कि.मी. अंतरावर आवश्यक आहे. कॅमेरा बसूनही नवले पुलावर अपघात काही कमी होत नाही मग हा कॅमेरा लावण्याचे प्रयोजन काय? दंड वसुलीद्वारे फक्त पैसे कमवण्याचा शासनाचा उद्देश आहे का?
– विजय सागर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत